मराठी कथा, लेख

Breaking

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

लग्नगाठ भाग 26

 गावाकडे काय काय झाले? हे सर्व विद्याच्या आईने विद्याला सांगितले.


 आईने सांगितलेले ऐकून एखाद्या चित्रपटाची कथा ऐकतेय की काय? असे विद्याला वाटत होते.


'चित्रपटात, कथाकादंबरी यात जसे दाखवले जाते, तसे वास्तव जीवनात होते?  की  वास्तव  जीवनात जे घडते,  ते चित्रपटात, कथाकादंबरीत दाखवले जाते? 


प्रत्येकाच्या आयुष्यात अशा अनेक घटना, प्रसंग घडत असतात. 

 प्रत्येकजण आपल्या आयुष्यरुपी कथेतील आपली भूमिका बजावत असतो.

 या कथेचा शेवट काय असेल? हे कोणालाच माहीत नसते. 

 स्मिताच्या भूमिकेमुळे विनयच्या आयुष्याचे रूपच बदलले. विनयच्या आयुष्यात येणाऱ्या मुलीची आता  काय भूमिका असेल? 

विचार केला तर..

 सगळं कसं वेगळंच घडत गेलं ना!

हे सर्व विधीलिखित असते का?

 आयुष्यात काय होईल? काही सांगता येत नाही.

 मागे एक सत्य घटना ऐकण्यात आली होती.

 मुलगा दिसायला चांगला, उच्चशिक्षित व चांगल्या पगाराची नोकरी असलेला होता. त्याचे एका सुंदर, उच्चशिक्षित व नोकरी करणाऱ्या मुलीबरोबर लग्न ठरले. 

'त्या मुलीसोबत लग्न करू नको. तू लग्न केले तर तुझे काही वाईट होईल.' 

अशा धमकीचे फोन त्याला येऊ लागले होते.


त्या मुलाने घरात हे सर्व सांगितले; पण घरातील लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत दोघांचे लग्न लावले.


 पण त्या धमक्या खोट्या नव्हत्या. त्या धमक्या  खऱ्या ठरल्या. 


 लग्नानंतर नवविवाहीत जोडपे फिरायला गेले आणि तिकडेच ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. 

यात चूक कोणाची?  असा विचार केला तर...त्या मुलीची? त्या मुलीच्या घरातील लोकांची? की त्या मुलाच्या घरातील लोकांची?


असे प्रश्न मनात येतात.


 जर सर्व परिस्थिती माहीत असताना देखील लग्न लावून दिले आणि शेवटी जे व्हायचे तेच झाले ना!


 लग्न झाल्यानंतर, एकमेकांच्या सहवासातून प्रेम बहरत जाईल, सुखाचा संसार फुलत जाईल. 

असे मुलामुलींच्या आई-वडिलांना वाटत असते आणि म्हणूनच ते काहीतरी तडजोड करुन त्यांचे  लग्न लावून देतात. पण पुढे चांगले होईलच.  असे कशावरून? 


 लग्नाची गाठ जरी बांधली गेली असेल; पण संसार सुखाचा होईलच?  हे काही सांगता येत नाही.

विनयच्या बाबतीत सर्व काही चांगले असतानाही, स्मिता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तिने इतर सर्व गोष्टींपेक्षा, त्या मुलावरील तिच्या प्रेमाला महत्त्व  दिले. 


आई, बहीण, विनय यांचा कोणाचाही विचार न करता, एवढा धाडसी निर्णय तिने घेतला.

'प्रेमात ताकद असते.'

असे म्हटले जाते.

स्मिताने हे कृतीतून सिद्ध करून दाखवले होते.

तिचा हा निर्णय, योग्य होता की मूर्खपणाचा? हे तिचे पुढचे आयुष्यच  सांगणार होते.'

मनातील या विचारांना  विराम देत, विद्या  आपले भविष्य घडवण्यासाठी  हॉस्टेलला जाण्याच्या तयारीला लागली.


क्रमश:

नलिनी बहाळकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...