मराठी कथा, लेख

Breaking

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

लग्नगाठ भाग 30

 'स्वप्नातही आपण इतरांच्या सुखाचा विचार करतो.  विनयशी  लग्न करण्याच्या आपल्या निर्णयाने, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.  टेन्शन जाऊन आनंद व उत्साह दिसत होता. सर्वांचा आनंद व उत्साह पाहून  मलाही आनंद होत होता.


पण कधी असेही मनात येते की, 

 आपण फक्त इतरांचाच विचार करत जगायचे का? कधी स्वतःच्या मनाचा विचार करायचाच नाही का?  

स्मिता पळून गेली.  विनयचा  विचार करत त्याच्यासाठी मुलीही बघितल्या आणि आता माझे नाव सुचवले गेले.

 पहिल्याच भेटीत विनय मला आवडला होता, पण स्मिता व त्याचा साखरपुडा झाल्यावर, मनातील त्या भावनांना मी आवरही घातला होता.

 पण नशीब म्हणावे की काय? 

  विनयबरोबर मी लग्न करावे. यासाठी  आता इतरांचे प्रयत्न सुरू आहेत.


  मनात विचार येतो की, जी व्यक्ती आपल्याला आवडली होती, त्या व्यक्तीसोबत आपले लग्न होणार आहे. खरंच किती भाग्याची गोष्ट! पण जर मी पहिली पसंद असते तर, जास्त आनंद झाला असता.

  दुसऱ्याच्या जागी जाणे.  माझ्या मनाला नाही पटत. 


मनात खूप वेगवेगळे विचार सुरू आहेत.  कधी स्वतःचा तर कधी इतरांचा विचार करते. काय निर्णय घ्यावा?  हे ही सुचत नाही.


'स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाचा विचार करावा. देव आपल्याला नेहमी सुखात ठेवतो.'


बाबा नेहमी असे सांगतात आणि ते तसे वागतातही.'


 असा खूप विचार करून शेवटी विद्या विनयसोबत लग्न करायला तयार झाली.


 स्मिताइतकी सुंदर नसली तरी विद्याही दिसायला छान होती. शिक्षणही चांगले होते. विनयची व तिची पत्रिका सर्व काही छान जुळत होते आणि  अशा कठीण परिस्थितीत ती लग्नाला तयार झाली.  यामुळे विनयच्या घरातही लग्नाची जोरात तयारी सुरू झाली.


 लग्नानंतर लगेच विद्याची परीक्षा होती. त्यामुळे अभ्यास व लग्नाची  तयारी यात तिची खूप धावपळ होत होती. 


विद्याचे इंजिनिअरिंगचे अजून एक वर्ष बाकी होते.  त्यामुळे तिच्या लग्नाबद्दलचा विचार आई-बाबांनीही कधी केला नव्हता. विद्या तर अभ्यास, करिअर याच विचारात होती.


 लग्न आणि तेही अशा परिस्थितीत व इतक्या कमी दिवसात  करण्याची वेळ त्यांच्यावर  आली होती.  त्यामुळे सर्व घाईघाईत होत होते.


 कमी दिवसात शक्य होईल तितकी तयारी करत, अगोदर ठरलेल्या तारखेला आणि ठरलेल्या ठिकाणी विद्या व विनयचा लग्नसोहळा छानपणे पार पडला.


 स्मितामुळे म्हणा की नशीबाने, विद्याची व विनयची एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली गेली. विनयसोबत लग्नाचे स्वप्न विद्याने पाहिले होते, ते आज प्रत्यक्षात खरे झाले होते.


क्रमश:

नलिनी बहाळकर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...