"मी या व्यक्तीला ओळखत नाही; पण तुम्ही ओळखत असतील. असे मला वाटते, कारण हा फोटो त्या दिवशी तुमच्या फाईलमध्ये मला दिसला. फोटोतील मुलगी खूप सुंदर व श्रीमंत घरातील आहे. असे दिसते."
विद्या विनयला म्हणाली.
"अगं, मग तू तेव्हाच का विचारले नाही मला या मुलीबद्दल?"
विनय म्हणाला.
"तुम्हांला जर्मनीला जायची घाई होती आणि या मुलीबद्दल विचारून तुमचा मूड वगैरे खराब झाला असता. असा विचार करून मी विचारले नाही."
विद्या म्हणाली.
"या मुलीबद्दल तू नाही विचारले तरी मी तिच्याबद्दल तुला स्वतःहून सांगतो.
ही रीना आहे. कॉलेजमध्ये माझ्यासोबत होती. तू जसे तिच्या सौंदर्याचे कौतुक करते आहे ना.. खरंच ती खूप सुंदर होती आणि मी तिच्या या सुंदरतेच्या प्रेमात पडलो होतो. पण प्रेम नुसते सुंदरतेवर अवलंबून नसते. प्रेमात स्वभाव, गुण पण जुळायला हवीत ना? मी रीनावर व तिच्या सुंदरतेवर मनापासून प्रेम करत होतो. कॉलेज लाईफ तसेच असते ना! बाकी काही दिसतच नाही त्यावेळी. रीना खूप सुंदर होती पण तितकीच तिला श्रीमंतीची हाव होती. चांगले राहणीमान व जीवनातील सर्व मौजमजा या गोष्टींकडे तिचा जास्त कल होता आणि म्हणूनच की काय माझे प्रेम नाकारत ती एका श्रीमंत मुलासोबत मौज मजा करू लागली होती.
माझे पहिले प्रेम यशस्वी झाले नाही. माझ्या जीवनात खूप नैराश्य आले होते. स्वतःला संपवून टाकण्याचा मी विचारही केला होता, पण आई-बाबा व सीमाताई यांच्यासाठी जगण्याचा निर्णय घेतला. रीनाला विसरण्याचा प्रयत्न करू लागलो आणि हळूहळू मन दुसऱ्या गोष्टीत रमवण्याचा प्रयत्न करू लागलो.
हा तिचा फोटो कॉलेजमध्ये असताना मी घेतला होता. त्यामुळे कॉलेजच्या कागदपत्रांच्या फाईलमध्ये तो राहिला असेल कुठेतरी. नंतर तिकडे लक्षच गेले नाही कधी. तुला त्या दिवशी कसा सापडला?" विनयने सर्व विद्याला सांगितले.
"रीना पुन्हा कधी भेटली नाही का आयुष्यात?"
विनय रीनाविषयी सर्व सांगत असताना, ते सर्व शांतपणे ऐकणाऱ्या विद्याने विनयला विचारले.
"नाही, मला ती पुन्हा कधी भेटली नाही; पण कॉलेजचा एक मित्र मला तिच्याबद्दल एकदा सांगत होता. ती ज्या श्रीमंत मुलाबरोबर मजा करत होती, त्याच्याबरोबर तिने लग्नही केले, पण लग्नाला वर्षही झाले नसेल, तेवढ्यात ते दोघे वेगळे झाले. हे ऐकून मला आश्चर्य वाटले नाही. कारण असे होणारच होते. सुंदरता, श्रीमंती हे सर्व पाहून किंवा फक्त आकर्षण म्हणून केलेले प्रेम जास्त काळ टिकत नाही.
प्रेम करणे सोपे असते ;पण ते टिकवणे अवघड असते.
मला वाटते माझ्या बाबतीत अगोदर जे झाले, ते चांगलेच झाले. कारण समजा रीनाबरोबर माझे लग्न झाले असते आणि तिच्या अपेक्षाप्रमाणे मी वागलो नसतो, तर मलाही ती अशीच सोडून गेली असती. त्याचा मला त्रास झालाच असता, पण माझ्या घरातील सर्वांनाही खूप त्रास झाला असता. आणि हे मला आवडले नसते."
विनय शांतपणे सर्व सांगत होता.
क्रमश:
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.