मराठी कथा, लेख

Breaking

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

खेळ नशिबाचा अंतिम भाग

 

 "आई-बाबा, माझी एक इच्छा पूर्ण करा ना.  मला अमेयच्या  घरी घेऊन चला ना. मला त्याच्या आई-बाबांना भेटायचे आहे. प्लीज ऐका ना माझे."


 हॉस्पिटलमधून घरी आल्यावर एक दोन दिवसांनी अमृता आई-बाबांना विनंती करत म्हणाली.


 "अमृता, आम्ही दोघे जाणार होतो अमेयच्या आई-बाबांना भेटायला तुला थोडे बरे वाटायला लागल्यावर.  तू आमच्यासोबत तिथे आले की तुला अमेयच्या आठवणीने अजून त्रास होईल बेटा. नको येऊ ना. ऐक आमचे."


अमृताचे बाबा तिला समजावत म्हणाले.


"बाबा, एकदाच आहे ना माझे. यानंतर तुम्ही सांगणार तसेच वागणार मी. पण आता घेऊन चला ना."


अमृता अगदी काकुळतीने  बाबांना म्हणाली.


 अमृताच्या विनंतीने तिचे आई-बाबा तिला सोबत घेऊन अमेयच्या आई-बाबांना भेटायला गेले. 


 'या घरात मी अमेयशी लग्न करून गृहलक्ष्मी म्हणून माप ओलांडणार होते. पण आज काय प्रसंग आणला आहे देवाने माझ्यावर! खरंच आयुष्य म्हणजे नशिबाचा खेळ असतो ना!  आपल्या आयुष्यात कधी खूप आनंदाचे क्षण येतात तर कधी  खूप दुःखाचे!' 


 असा विचार अमृताच्या मनात आला, जेव्हा ती अमेयच्या घरात जात होती. 


त्याच्या आई-बाबांशी व भावाशी काय बोलावे? त्यांचे कसे  सांत्वन  करावे? हे अमृता व तिच्या आई बाबांना समजत नव्हते. दोन्ही कुटुंबांना दुःख झाले होते. एका कुटुंबाने आपला मुलगा गमावला होता आणि दुसऱ्या कुटुंबाने आपल्या मुलीचा आनंद!

अमेयने असे का केले? का सर्वांना दुःख देऊन गेला? या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नव्हती. उरल्या होत्या फक्त अमेयच्या आठवणी! 


"तुमची अमृता खूप गुणाची आहे.  आमच्या घरची सून व्हावी अशी आमची खूप इच्छा होती; पण नियतीच्या मनात काय होते माहित नाही.  नियतीने आपला खेळ खेळला. आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात कायमचे दु:ख दिले. नशिबापुढे कोणाचे काही चालत नाही. असे म्हणतात.  आमचा अमेय तर गेला कायमचा आम्हांला सोडून पण अमृताचे आयुष्य सुखाचे व्हावे अशी आता आमची इच्छा आहे.  एखादा चांगला मुलगा बघून तिचे लग्न करून द्या. अमेयच्या आठवणीत आयुष्य कसे जगेल ती?"


 अमृताच्या काळजीने अमेयचे आई-बाबा अमृताच्या आई बाबांना म्हणाले.


"जे झाले ते खूप वाईट झाले. तुमचे दु:ख आम्ही समजू शकतो. तुमचे सांत्वन  कसे करावे? खरंच समजत नाही. पण आता कितीही रडले, तरी अमेय परत येणार नाही. लहान मुलाकडे बघा. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या." 


अमेयच्या आई-बाबांशी सांत्वनाचे शब्द बोलताना अमृताच्या आई-बाबांना अश्रू अनावर होत होते.

जड अंतकरणाने  त्यांचा निरोप घेत अमृता व तिचे आई-बाबा आपल्या घरी परतले.




 अमृता व तिची आई काही दिवसांसाठी मावशीकडे राहायला गेल्या.


 तिला अमेयला विसरणे शक्यच नव्हते. त्याच्यासोबतचे क्षण, त्याच्या आठवणी काढत अमृता रडत असायची.  आई व मावशी तिला खूप समजावून सांगायच्या. तिचे मन दुसरीकडे लागावे यासाठी त्या प्रयत्न करत असायच्या.


 असेच काही दिवस व महिने उलटत गेले. 



 अमृताने अगोदरची नोकरी सोडली होती.  आता दुसरी नोकरी शोधली होती जेणेकरून मन कुठेतरी गुंतून राहील. हळूहळू ती कामात लक्ष देऊ लागली.  

अमृता अगोदरसारखी आनंदी नव्हती पण आता थोडी स्थिर होते आहे.  हे पाहून तिच्या आई-बाबांना थोडे बरे वाटत होते.


  काही महिन्यांनी,


ओळखीतील एका नातेवाईकाने अमृतासाठी एक स्थळ आणले. अमृताची लग्न करायची इच्छा नव्हतीच पण आई-बाबांनी तिला सर्व व्यवस्थित समजावून सांगितले तेव्हा ती लग्नाला तयार झाली.

 मुलाला व त्याच्या आई-बाबांना  अमेयविषयी सांगितले म्हणजे नंतर अमृताला काही त्रास नको. 

 ते लोकही खूप चांगले होते. त्यांनी 

 पण अमृताचा विचार केला आणि लग्नाला तयार झाले.


दोघीकडच्या संमतीने  लग्न छान पार पडले व अमृताने आपल्या नवऱ्यासोबत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.


समाप्त 

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...