स्मिता एका मुलाबरोबर पळून गेली हे जेव्हा अरुणरावांना शेखरने फोन करून सांगितले, तेव्हा त्यांना स्मिताच्या अशा वागण्याचा धक्का बसला आणि वाईटही वाटले.
'तिचे लग्न ठरलेले असतानाही तिने असे का केले? आता तिकडच्या लोकांना काय सांगावे? त्यांना काय वाटेल? आणि विनयच्या लग्नाचे काय? स्मिताने हा सर्व विचार का केला नाही? तिने तिच्या आईचाही विचार केला नाही. त्यांनाही किती वाईट वाटत असेल.'
हा सर्व विचार व स्मिताच्या आईच्या दुःखाचा विचार करता करता अरुणरावांना भूतकाळातील अनेक गोष्टी आठवू लागल्या.
"काय झाले छाया? का रडते आहेस?"
अरुणने काळजीने छायाला विचारले.
"अरे, मी इथे बाहेर खेळत होती. तिकडून शरद दादा पळत पळत आला आणि त्याच्या धक्क्याने मी पडली. माझ्या हाताला व पायाला लागले. खूप दुखते आहे."
हाताला व पायाला झालेली जखम दाखवत छाया अरूणला म्हणाली.
मुळातच मनाने हळवा असलेला अरूण छायाच्या पायाला व हाताला झालेली जखम पाहून दुःखी झाला. तिच्या जखमांवर हळूवार फुंकर घालू लागला व विद्याचे रडणे थांबवू लागला. तेवढ्याने तो थांबला नाही. तो पळत जाऊन घरातून हळद घेऊन आला व तिच्या जखमांवर लावू लागला.
मोठा भाऊ धक्का मारून चालला गेला. त्याने साधे मागे वळून पाहिलेही नाही की, आपल्या धक्क्याने छाया पडली... तिला काही लागले की काय? आणि दुसरा भाऊ इथे काळजी घेतो आहे. हे पाहून छायाला शरददादाचा खूप राग आला व अरूणविषयी जिव्हाळा वाटू लागला.
लहानपणी शाळेला सुट्ट्या लागल्या की, शरद दादा, अरुण, शेखर आशाताई व उषा ही सर्व भावंडे मामाच्या गावाला जायचे. मोठ्या मामाच्या दोन मुली व एक मुलगा. लहान मामाचा एक मुलगा व एक मुलगी. हे सर्वजण एकत्र खेळायचे. खूप मजा करायचे. छाया मोठ्या मामाची मोठी मुलगी होती.
शरद दादा खूप मस्तीखोर होता. कधी शांत बसायचा नाही. काही ना काही उचापती करत असायचा. यासाठी तो सर्वांचे बोलणेही ऐकायचा. कधी कधी मारही खायचा. पण त्याला त्याचे काही वाटायचे नाही. याउलट अरुण एकदम शांत. इतरांचे दुःख पाहून दुःखी होणारा आणि इतरांना मदत करणारा होता. त्यामुळे तो सर्वांना आवडायचा.
लहानपणी एकत्र खेळणारे सर्व बहिण भाऊ मोठे होत होते.
छाया आणि अरुणचे विचार व स्वभाव जुळत होते; त्यामुळे त्यांची छान मैत्री जुळत गेली.
क्रमश:
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.