'विनयसारखा चांगला मुलगा भेटल्यावर आणि साखरपुडा झालेला असताना स्मिता कोणा मुलाबरोबर का पळून गेली? तिला विनयबरोबर लग्न करायचे नव्हते तर साखरपुडा का केला? तिचे त्या मुलावर प्रेम असेल तर तिने घरात तसे अगोदर का सांगितले नाही? पळून जायचे होते तर अगोदरच गेली असती ना! आता नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांना नको त्या चर्चा करायला एक विषय मिळेल. ते काकूंना चुकीचे ठरवतील, नको ते बोलतील आणि विनयच्या घरी पण टेन्शन आले असेल. त्याच्या मनाला काय वाटत असेल? सर्वांना स्मिताच्या वागण्याचा राग येत असेल ना? आता पुढे काय होईल? काय निर्णय घेतला जाईल? हे सर्व आपल्याला आई-बाबा घरी आले की तेव्हाच समजेल.'
विद्याच्या मनात असे विचार चक्र सुरू होते.
विद्याला हॉस्टेलला जायचे होते आणि अरूणरावांनाही पुढे रजा नव्हती. म्हणून दोन दिवसांनी गावाहून ते घरी परत आले.
काय झाले असेल? हे सर्व ऐकण्यासाठी विद्या आतुर झाली होती.
"आई, स्मिताने असे का केले?"
विद्याने आईला प्रश्न विचारत विषयाला सुरुवात केली.
"अगं, कॉलेजमध्ये काही काम आहे. असे वहिनींना सांगून स्मिता सकाळी कॉलेजला गेली. बराच वेळ झाला तरी ती आली नाही, म्हणून वहिनींनी स्मिताच्या जवळच्या मैत्रिणींना फोन करून, त्यांच्या घरी जाऊन विचारले. ती त्यांच्याकडे गेलेली नव्हती आणि त्यांनी सांगितले की 'आता कॉलेजला काही कामही नव्हते.' हे ऐकून वहिनी घाबरल्या. स्मिताच्या बाबतीत काही चुकीचे झाले की काय? अशी मनात भीतीही वाटली. शेखर भाऊजी कॉलेजला जाऊन आले. तिथे स्मिता आलीच नाही असे समजले.
सर्वीकडे तिचा तपास सुरू झाला. नातेवाईक, मित्रमंडळी व ओळखीतील लोक या सर्वांकडे विचारले गेले. मंदिर, बगीचे, बसस्टॉप,स्टेशन सर्वत्र तिचा शोध घेऊ लागले.
' पोलिसांची मदत घेऊ या.' असे कोणी सुचवले; पण 'संध्याकाळपर्यंत वाट पाहूया.' असे अनेकांचे मत होते. त्यामुळे तिचा तपास सुरू ठेवत सर्वजण वाट पाहू लागले.
रात्री बऱ्याच उशिराने कळले की,
घरापासून थोड्या अंतरावर स्मिताची एक मैत्रीण राहते ; तिच्या भावासोबत स्मिता पळाली. तो मुलगाही रोजप्रमाणे घरी आला नाही. खूप रात्र झाली; म्हणून त्याचा तपास घरातले लोक करू लागले. त्याच्या घरातील लोकांना घरात एक चिठ्ठी सापडली त्यात लिहीले होते की, त्याचे व स्मिताचे एकमेकांवर प्रेम आहे आणि ते घर सोडून जात आहेत.
क्रमश:
नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काही शंका असल्यास , जरूर कळवा.