मराठी कथा, लेख

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

दुतोंडी वागणूक भाग 3

 "अगं वर्षा, तू जा माहेरी. तुलाही आरामाची गरज आहे.  माहेरी सर्वांची भेट होईल आणि थोडा आराम पण मिळेल ना तुला. प्रतिक्षाची काळजी घ्यायला व काम करायला आहे मी इथे. तू नको काळजी करू."


 निर्मलाताईंनी वर्षाला सांगितले.


 वर्षाला माहेरी जायचे होते. सर्वांना भेटायचे होते. तिचे काकाही आजारी होते,त्यामुळे त्यांनाही भेटणे गरजेचे होते. सासरी नात्यात लग्न होते, म्हणून ती मुंबईहून सासरी आली होती आणि नंतर माहेरी जाणार होती.  समीरला काम होते म्हणून तो आला नव्हता. 


वर्षा तीन महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे तिला उलट्यांचा त्रास होत होता.  अशक्तपणा आलेला होता. कधी माहेरी जाऊ! असे वर्षाला वाटत होते, पण इकडे प्रतीक्षा वहिनींनाही बरे वाटत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले होते.  


 'वहिनी आजारी आहेत,तू माहेरी लगेच जाऊ नको. त्यांना थोडे बरे वाटले की मग जा.'


 असे समीरने वर्षाला फोन करून सांगितले होते.

 नवऱ्याने सांगितलेले ऐकून आणि परिस्थिती पाहून वर्षा पाच सहा दिवसांपासून सासरी  होती व  तब्येत सांभाळून कामे करत होती. सासूबाईंची थोडीफार मदत होत होती. त्यामुळे थोडा आधार  वाटत होता.  पण तिने पाहिले की, सासूबाई त्यांच्या दुतोंडी वागणुकीमुळे एकीकडे वहिनींशी प्रेमाने व काळजीने वागत होत्या तर दुसरीकडे रागाने व आदळआपट करत  घरातील कामे करत होत्या.


 लग्नानंतर तीन वर्षात वर्षाने सासूबाईंचा  अशा दुतोंडी  वागणुकीचा अनुभव चांगलाच अनुभवलेला होता. त्या अधूनमधून मुंबईला तिच्याकडे आल्या की, घरातील तिची स्वच्छता, टापटीप व   तिने केलेला स्वयंपाक अशा सर्व गोष्टी पाहून  त्या तिचे कौतुक करायच्या आणि प्रतीक्षा वहिनींच्या वागण्याविषयी तक्रार करत बोलायच्या.

 'तिला स्वच्छतेची आवड नाही, स्वयंपाक पण व्यवस्थित येत नाही. वगैरे वगैरे.' 




 ज्या अर्थी सासूबाई वहिनींविषयी माझ्याजवळ बोलतात त्याअर्थी त्या वहिनींजवळ माझ्याविषयी सांगतच असतील. कारण माझ्यासमोर जरी त्या माझे कौतुक करतात पण माझ्यातील त्यांना दिसणारे दोष त्या नक्कीच वहिनींना किंवा अजून कोणाला तरी सांगत असतील. त्या जेव्हा वहिनींविषयी किंवा अजून कोणाविषयी  माझ्याजवळ असे काही सांगू लागल्या की मी फक्त ऐकून घेते किंवा दुसऱ्या विषयावर  बोलायला लागते.


 प्रत्येकात चांगले व वाईट दोन्ही गुण असतात. परिपूर्ण कोणी नसते.

 

जीवन जगत असताना,

आपल्या नात्यात, मैत्रीत  किंवा ओळखीत असे होतच असते की, 

आपल्याविषयी कधी चांगले तर कधी वाईट आपल्या गैरहजेरीत  इतरांमध्ये बोलले जाते.


 काही लोक आपल्यासमोर आपल्याशी खूप चांगले वागतात पण आपल्याबद्दल इतरांजवळ  वाईटही सांगत असतात.


  दुतोंडी वागणूक असणारे लोक आपल्याला भेटतातच. त्यांच्या वागण्याचा आपल्याला त्रासही होतो.


 अशावेळी अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपले जीवन जगावे किंवा त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांना योग्य शब्दांत समजावून  सांगावे.


 'आता घरातच सासूबाई अशा वागत असतील तर काय करावे?' हा प्रश्न वर्षापुढे  होता.



 आताही त्यांनी तिला माहेरी जाण्याचे सांगितले होते. पण त्यांच्या या बोलण्यावर वर्षाला विश्वास बसत नव्हता.  यातही त्यांची दुतोंडी वागणूक असेल.  असे तिला वाटले आणि तसेच झाले होते.




क्रमश:

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...