मराठी कथा, लेख

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

दुतोंडी वागणूक अंतिम भाग

 "वर्षा, तुला माहेरी जायचे असेल तर जा. आता मला बरे वाटते आहे. माझ्यामुळे तुला त्रास होतो आहे."


प्रतीक्षा वर्षाला म्हणाली.


"काय झाले वहिनी? असे का म्हणताय तुम्ही?"


प्रतीक्षाच्या चेहऱ्यावरील हावभाव व बोलण्याचा स्वर पाहत वर्षाने विचारले.


 "आई यांना सांगत होत्या की,

 'वर्षा  माहेरी जायचे म्हणते आहे.  तिला जाऊ द्यायचे की राहू द्यायचे अजून काही  दिवस?  प्रतीक्षाला बरे नाही ना म्हणून विचारते आहे तुला.'



हे मी ऐकले आणि म्हणून तुला सांगते आहे."



 प्रतीक्षा वर्षाला म्हणाली.


 प्रतीक्षा वहिनी असे म्हणताच,


 वर्षाला कळले की, सासूबाईंनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे पुन्हा आपले काम केले आहे. 


 वर्षाला तर माहेरी जायचेच होते. आता वहिनींना थोडे बरेही वाटत होते.  त्यामुळे आता घरी कोणी आपल्याला इथे थांबायला सांगितले तरी थांबायचे नाही.  आपली बाजू व्यवस्थित सांगायची. आपली तब्येत पण बरी नाही आणि माहेरी काका आजारी आहेत, सर्वांना भेटायचेही आहे आणि थोड्या दिवसांनी पुन्हा मुंबईलाही जायचे आहे. हे सर्व सांगावेच लागेल नाही तर मला माहेरी जायलाच मिळणार नाही.

असा वर्षाने विचार केला पण त्याअगोदर तिने प्रतीक्षा वहिनींना सासूबाईंच्या दुतोंडी वागणूकीचा आतापर्यंतचा तिला आलेला सर्व अनुभव सांगितला.  वर्षाने असेच त्यांना सांगताच, त्यांनाही असेच अनुभव आले आहेत असे त्यांनी सांगितले. पण घरात सासूबाईंच्या मुलांना असे सांगितले तरी ते आपल्या आईची चूक  मान्य करणार नाही. त्यांनी त्यांच्या नवऱ्याला हे अनेकदा सांगितले होते पण  त्याचा काही उपयोग झाला नव्हता.  समीर पण तसाच आहे याचा अनुभव वर्षाला आला होता. मुले जरी आपल्या आईच्या या वागणुकीविषयी तिला काही समजावत नसले तरी,  प्रतीक्षा व वर्षाने ठरवले होते की, आईनी आपल्या दोघांविषयी एकमेकांना काहीही सांगितले तरी अगोदर त्या एकमेकींशी त्या विषयावर बोलणार म्हणजे खरे काय आणि खोटे काय? हे समजून येईल. निर्मलाताईंच्या  अशा वागण्याने घरामध्ये, नात्यांमध्ये जो दुरावा येणार होता  आता तो प्रतीक्षा  व वर्षाच्या एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याने आला नाही.  उलट दोघी जावा आता एकमेकींच्या छान मैत्रिणी झाल्या होत्या.



 "काय बाई! विजयाताईची सून काही कामाची नाही. विजयाताई दिवसभर काम करत राहते. सून आणून काहीच सुख नाही बिचारीला! बरं झालं!  देवाने मला दोघी सुना चांगल्या दिल्या आहेत!"


 बऱ्याच वेळापासून  आपल्या मैत्रीणीकडे विजयाताईंकडे गेलेल्या निर्मलाताई घरी आल्यावर आपल्या दोघी सुनांना म्हणाल्या.


 त्यांच्या अशा बोलण्यावर प्रतीक्षा व वर्षा एकमेकींकडे पाहत हसल्या. त्यांना माहित होते की, विजयाताईंकडे आपल्या दोघींविषयी सासुबाईंनी बरेच काही  सांगितलेले असेल.



समाप्त 

नलिनी बहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काही शंका असल्यास , जरूर कळवा.

धार्मिक अधर्मी

 "किती अभद्र विचार आहेत गं या माणसाचे!"   पल्लवी आपल्या मैत्रिणीला अनिताला म्हणाली.   "आता गाडी घेऊन गेला तोच ना?"  अनित...